🌹एका आईची दुसरी पाळी 🌹
सामाजिक समस्या समजून घेतल्या तर त्या नक्कीच सुटू शकतात, फक्त त्या सोडविण्यासाठी मनात तळमळ असावी लागते.आज आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिन आहे.हळूहळू समाजात याविषयी जनजागृती होत आहे.आम्ही प्रशिक्षित महिला मासिक पाळी व्यवस्थापन या विषयाची माहिती सर्वत्र पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत.खरं तर पुरुष वर्ग या विषयापासून पहिल्या पासूनच अनभिज्ञ आहे.याला कारणच आपली सामाजिक परिस्थिती आहे.पण काळ बदलत आहे.आपणही या सामाजिक समस्येचा बारकाईने विचार करणे गरजेचे आहे.
मासिक पाळी व्यवस्थापन या विषयाचं प्रशिक्षण मतिमंद मुलींच्या माता पालकांना देताना अनेक भयानक अनुभव समोर आले.ज्या समस्यांचा समाज कधी विचारचं करीत नाही.शेवटी ज्याच्या यातना त्यानेच भोगायच्या अशीच समाज निती आहे.मतिमंद मुलींना सांभाळणं तसं अवघड काम आहे.त्यात तर वयात आलेली मतिमंद मुलगी म्हणजे आई बापाच्या जीवाला मोठाच घोर असतो.अशा मुलींना मासिक पाळी म्हणजे काय हे समजतं नाही.त्यावेळी शोषकं व्यवस्थित वापरणं,स्वच्छता राखणं हे काहीही त्यांना समजतं नाही.अशा मुलींच्या आईंनाच त्यांचं सारं करावं लागतं.त्यामुळे मतिमंद मुलीची मासिक पाळी ही तिच्या आईची दुसरी पाळी असते असंच मला वाटतं.
आपल्या समाजाची वासना इतकी भयानक कि,अशा निष्पाप मुलींना देखील साले ओरबाडून खातात.एक किस्सा असाच यावर जागृती करताना ऐकला होता.....एक मतिमंद मुलगी आई व आजी सोबत राहत होती.घरची गरीबी! पोटाच्या आगीसाठी आई बिचारी मंजुरीसाठी जाई.आजी मुलीला सांभाळत होती.अशा मुलींची शारीरिक वाढ झपाट्याने होत असते.ही मुलगी देखील वयात आली.आई आजीला दटावून सांगे कि,हिला एकटीला सोडून जाऊ नका.पण व्हायचं तेच झालं.ती मतिमंद मुलगी प्रेग्नंट आहे असं समजल्यावर तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली.एवढी आजीनं काळजी घेऊन हे कसं घडलं? सांगताना देखील माझ्या अंगावर काटा उभा राहतोय.तिच्या मामानेच त्या मुलीशी संबंध ठेवले होते.आजीला आणि आईला खूप मोठा धक्का बसला.
मित्रहो,अशा अनेक घटना आहेत.समाजातील नालायक विकृती आजूबाजूच्या मतिमंद भिकारी महिलांना देखील सोडतं नाहीत.आपणास या समस्यांची खूपदा जाणीव देखील नसते.मतिमंद मुलींची पाळीच्या काळात काळजी घेणाऱ्या माता खरंच धन्य आहेत.खूप मातांचे प्रशिक्षण घेताना अनुभव ऐकले.आपल्या मतिमंद लेकरांची अवस्था सांगून त्या धाय मोकलून रडत होत्या.क्षणभर मी देखील सुन्न झाले.त्या विधात्याला शिव्या देखील घातल्या.खरच अशा मुलींना सांभाळणं महा दिव्य असतं.तरीही त्यांच मातृत्व किती महान पहा,... असं निष्पाप लेकरू म्हणजे जणू देवाचं रुप समजून त्या त्यांचा सांभाळ करतात.सलाम अशा मातृत्वाला!🙏
मला तर वाटलं की,अशा मुलींचं गर्भाशय पालकांनी स्वच्छेनं काढून टाकावं.कारण वासनेने अंध झालेल्या विकृत मनोवृत्तीला काही समजतं नाही.अशा मुली जर का याला बळी पडल्या तर संपूर्ण कुटुंबाची वाताहत होते.म्हणूनच यावर समाजाने नक्की विचार करावा.
सौ.सुधा पाटील सांगली 8459730502
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा