🌹मनाचा दगड 🌹
काही दिवसांपूर्वी एका भाजी विकणाऱ्या आजीशी मनसोक्त गप्पा मारण्याचा योग आला.गप्पा मारता मारता आम्ही एकमेकींच्या मनात शिरलो आणि नकळतच औपचारिकता संपून अनौपचारिक नातं निर्माण झालं.जेव्हा अशी नाती निर्माण होतात तेव्हा कसलाही आडपडदा राहत नाही.माणूस माणसाशी क्षणात एकरुप होतो.आणि मग तिथेच मनाची कवाडं खुली होतात.मनसोक्त अनौपचारिक गप्पा सुरू होतात.मनात पुसट झालेल्या किंवा कोरलेल्या वेदना किंवा ठामपणा आपोआप बाहेर येतो.
गप्पांची सुरवात अर्थातच कोरोनाच्या संकटावरून झाली.आजी म्हणाली,त्याला काय भ्यायच बाई! आयुष्यात अशी अनेक संकटं झेलली आहेत.मनाचा कसा दगड झालाय.कुठलं बी संकट आलं तरी, मनाला थडकून परत जातंच बघ.फक्त आपल्या मनाचा दगड अभेद हवा.मी क्षणभर आजीकडे पाहतच राहिले.मग आजीची विचारपूस करु लागले.आजीलाही माझी ओळख पटली असावी.एका जीवलग मैत्रिणीशी बोलावं तशी ती बोलू लागली.आज घडीला सत्तर वय आहे माझं! पण तुमच्या सगळ्या तरण्या पोरींना कामात माग सारते मी!आजी तु भारीच आहेस हं! तुझ्या घरी कोण कोण असतं ग?एक सून आणि नातू आहे.अग पोरी, माझ्या जन्माची हिस्ट्री लयी भयानक आहे.हे सांगताना ती अजिबात हळवी झाली नव्हती.पुढे ती म्हणाली,नवरा दारुडा होता.जीवंत होता तोवर लयी छळलं मला गड्यान!पण मीही नमले नाही.शेवटी अंथरुणाला खिळून राहिला.माझं कर्तव्य म्हणून त्याची सेवा केली.घरची गरीबी,लेकाला शाळा शिकवता आली नाही.कसंतरी मोलमजुरी करून चांगलं चाललं होतं.तोवरच पोरगा कॅन्सरने मेला.एक नातू आहे तो पण पायानं अधू आहे.आम्ही सासू सून भाजी विकून जगतोय आनंदानं! हे बघ पोरी,नियती आपल्या पुढ्यात काय वाढलं ते आपल्याला ठाव नसतय.पण मनाचा दगड केला तरंच दु:ख झेलून जगता येतंय.पण मनाचा दगड करायचा म्हणजे निष्ठूर व्हायचं नाही बरं! जीवनाचं दु: खं झेलून आपल्या वाट्याचा आयुष्य आनंदाने जगण्यासाठी कणखर व्हायचं!
आजीच हे तत्त्वज्ञान ऐकून मी मात्र सुन्न झाले...... खरंच आपण बऱ्याच गोष्टींचा खूपच बाऊ करतो.कित्येकदा आपलं मानसिक दुबळेपण आपणास संपवून टाकतं.मनाचा दगड आयुष्यात येणाऱ्या संकटांशी आपण कशी झुंज देतो यावर अवलंबून असतो.आयुष्य हे आजमध्ये असतं.आज ,आता,हा क्षण म्हणजे आयुष्य! पण आपण उगाचच भूतकाळातील सावल्या घेऊन वर्तमानातील आनंद हरवून बसतो.संवेदनशीलता जपतंच मनाचा दगड आपणासही करता आला तर?
सौ.सुधा पाटील