सोमवार, २७ जुलै, २०२०

हसती बागडती पाळी

🌹हसती बागडती मासिक पाळी!🌹

     मासिक पाळी! निसर्गाकडून स्त्री जातीला लाभलेली एक अनमोल देणगी! आकाशात पूर्वेला उगवणारा सूर्य साऱ्या सृष्टीला नवजीवन देतो.अगदी तसंच मानवाला मानवी जीवन बहाल करणारी,मानवी अंकुर तयार करणारी ही मासिक पाळी असते.पण ही सखी आजवर अज्ञानाच्या अंधकारात अडकून वाईटपणाच्या कलंकाने कलंकितच राहिली.ती नसेल तर मानवी जीवन निर्माण होऊच शकत नाही.हे ठाऊक असूनही तिचं महत्त्व पायदळी तुडवलं गेलं.आजवर एक स्त्री मासिक पाळी या नैसर्गिक क्रियेमुळे दूषितच ठरली गेली.खरं तर इतर अवयवांच्या कार्याप्रमाणे मासिक पाळी हे देखील प्रजनन संस्थेचं कार्य! पण आजवर सामाजिक रुढी परंपरा यांनी मासिक पाळी हा विषय जणू काहीतरी भयंकर रहस्य असं समजून तो उगाचंच अवघड, अगम्य बनवून ठेवला.विज्ञानाने देखील एकविसावे शतक उजाडले तरी त्यावर प्रकाश टाकला नाही.ही शिक्षणाची मोठी शोकांतिका आहे.परंतू देर आये दुरुस्त आये या उक्तीप्रमाणे युनिसेफ, शिक्षण विभाग, सामाजिक संस्था या विषयाची जागृती आणण्याचं काम करीत आहेत.ही एक क्रांतीकारक बाब आहे.ज्ञानाची पहाट होऊ पाहत आहे.त्यामुळे मासिक पाळीचे व्यवस्थापन कसं करावं याची माहिती आजच्या महिलांना मिळू लागली आहे.निदान सुंदर अशा बदलाची सुरुवात झाली आहे.ही एक महिला जगतासाठी आनंदाची, मुक्त स्वातंत्र्याची गोष्ट आहे.
     मासिक पाळी व्यवस्थापन याची शास्त्रीय माहिती घेऊन या आपल्या सखीचं आपल्या आयुष्यात हसत खेळत आगमन व्हावं.आपल्या मुली बाळी यापुढे मासिक पाळीला समस्या न मानता सखी मानतील याची काळजी आपणच सुशिक्षित समाजाने घ्यायची आहे.मासिक पाळी बाईच्या शरीराचा हिस्सा असली तरी ती संपूर्ण कुटुंबाची असते.एक निरोगी महिला एक निरोगी कुटुंब निर्माण करीत असते.म्हणूनच मासिक पाळीतील समस्या समजून घेऊन प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या कुटुंबातील महिलेच्या आरोग्याची काळजी घेतली तर ती महिला निरोगी बाळ जन्माला घालू शकते.म्हणूनच प्रत्येक स्त्री आणि पुरुष वर्गाने मासिक पाळी आणि महिलांचं आरोग्य याचा सहसंबंध समजून घेऊन काळजी घ्यावी.तरच भावी पिढी सुदृढ निरोगी जन्मू शकते.
     आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिन साजरा करण्याचा उद्देश जागृती करणं, मासिक पाळीच्या अज्ञानाने महिलांना होणारे आजार याविषयी मार्गदर्शन करणं, मासिक पाळीचा बाऊ न करता ती सहजपणे स्वीकारणं हाच आहे.म्हणूनच मासिक पाळी समजून घेऊया.अज्ञान संपवून तीला हसती बागडती सखी बनवूया.मासिक पाळीतील अंधश्रध्दा संपवून ती एक सहज अशी शारिरीक क्रिया आहे हे लक्षात घेऊन विचार आता तरी बदलूया.अज्ञानाने आजवर अनेक कळया कोमेजून गेल्या.बालपण अकाली हरवून पोक्त झाल्या.पण ही पाळी बालपण हिरावण्यासाठी येतंच नाही.ती तर येते मुलीला फुलवण्यासाठी,भावी मातृत्वाची चाहूल देण्यासाठी! हेच वास्तव आता सर्वांना सांगूया.आजच्या मुलींना समाजाने, पालकांनी पाळीविषयी सखोल,डोळस ज्ञान दिले तर मुलींचं अकाली बालपण हरवणार नाही.घरातील पालकांनी देखील मुलीच्या पाळीचा बाऊ न करता तीला तीचं बालपण सहजपणे जगू द्यावं.मासिक पाळीचं व्यवस्थापन उत्तम कसं करायचं याची माहिती मिळाली कि, मासिक पाळी कधीच, कशातही अडसर बनतं नाही.म्हणूनच चला तर मग.... मासिक पाळीला समजून घेऊन तीला हसत हसत स्विकारुया.तिला हसती बागडती ठेऊया.
🌹आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
सौ.सुधा पाटील सांगली (8459730502)

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

फादर्स डे

फादर्स डे.... शब्द पुष्पांजली माझ्या लाडक्या बाबांसाठी....जे अनमोल आहेत माझ्यासाठी.. ज्यांच्यामुळे मी आणि माझं अस्तित्व आहे...
     
      खरं तर आई विषयी खूप लिहिलं.पण आपल्या मुलीला शिकवून स्वत:च्या पायावर उभं करून तिला स्वावलंबी बनवण्याचं स्वप्न पाहून ते जिद्दीने पूर्ण करणाऱ्या माझ्या बाबांविषयी लिहिणं आजवर झालंच नाही.याची खरंच खंत वाटते.पण आम्ही लेखिका ग्रुपमध्ये फादर्स डे निमित्त हा जो उपक्रम घेण्यात येत आहे त्यामुळे बाबांसाठीच्या भावना व्यक्त करता येत आहेत.खर तर जीवन जगण्यासाठीचं धैर्य देणारा माझा बाबा कधीच शब्दात मावणारा नाहीच.
     माझे बाबा मिलिटरी मॅन होते.त्यामुळे खूपच कणखर पण मनाने खूपच प्रेमळ! बाहेरच्या जगाच ज्ञान असल्याने तसेच मिलिटरीत वीस वर्षे काढल्याने त्यांना मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व माहिती होतं.म्हणूनच आईचा विरोध पत्करून त्यांनी मला डी.एड. केलं.नोकरी लागल्यानंतरच माझ्या लग्नाचा विचार त्यांनी केला.त्याकाळी मुलींना जास्तीत जास्त दहावी पर्यंत शिकवायचे.पण त्यांनी तुला नोकरी लागल्यावरच तुझ्या लग्नाच बघायचं हा मला दिलेला शब्द खरा केला.
     माझ्या बाबांचा माझ्यावर खूप जीव होता.माझे सारे लाड यांनी पुरवले.ते नेहमी म्हणायचे,'आपलं नशीब आपणंच घडवायचं असतं.कष्ट करा... हवं ते मिळेल हे त्यांचं ब्रीद आजही प्रेरणा देत राहतं.त्यांच्यामुळे माझं बालपण खूप सुंदर गेलं.ते एक आठवण सांगायचे....मी लहानपणी झोपत नसले कि ते माझ्यासाठी एक गाणं म्हणायचे....ताई गुणाची माझी छकुली झोका दे दादा म्हणू लागली.मग मी शांत झोपी जायचे.माझ्या बाबांनी मुलगा मुलगी असा भेद कधीच केला नाही.माझ्या बाबा हे कर्मावर निष्ठा असणारे होते.तसेच ते खूपच प्रेमळ आणि काळजी घेणारे असे होते.आई आजारी असली की ते स्वत: सारं काम करायचे.ते स्वत:ची कामे स्वत: करायचे.तेच स़स्कार नकळत मनावर उमटले.धाडसी,करारी आणि खरेपणा हे माझ्या बाबांचे गुण मनानं आपोआप उचलले.आजही बाबा एक आदर्श बनून प्रेरणा देत राहतात.
सुधा पाटील सांगली

एकांत आणि एकाकीपणा

🌹एकांत आणि एकाकीपणा.....🌹
    खरं तर एकांत आणि एकाकीपणा या दोन भिन्न मानसिक संकल्पना आहेत.खूफदा मानसिक शांतीसाठी एकांत हवा असतो.काही काळ एकांतात बसले कि आपलीच आपल्याशी भेट होते.आपणच आपणास ओळखू लागतो.म्हणूनच स्वचा विकास करण्यासाठी कधी कधी एकांत खूपच गरजेचा असतो.पण एकाकी आयुष्य जगताना खुपदा नैराश्य येऊ शकते.पण काही काही माणसं एकाकी असली तरी ती त्यास एकांत बनवून छान आयुष्य जगतात.एकाकीपणास एकांत ज्याला बनवता येतो तो त्याचा सदुपयोग करतो.पण जे एकाकीपणात अडकून सतत नैराश्यात अडकतात ते दबावाखाली आयुष्य जगतात.
     खूपदा माणसाच्या गर्दीतही माणूस एकाकी असतो.आणि एकटा असला तरी तो एकांत आनंदाने अनुभवतो.एकांतात माणूस शांती अनुभवू शकतो.आनंदमय अशा आठवणीत आजूबाजूला गर्दी अनुभवतो.म्हणूनच म्हणतात,एकटा माणूस कधी कधी आजूबाजूला गर्दी अनुभवतो.तर गर्दीतही कधी कधी माणूस एकटा असतो.खरं तर या मानसिक अवस्था समजून घेणं गरजेचं आहे..... क्रमशः...

कविता माझी..

आम्ही लेखिका ग्रुप..काव्यपुर्ती उपक्रम
नसिफा सय्यद यांच्या ओळींवरून मी काव्यपूर्ती करित आहे..

    🌹हसरी बाई 🌹

प्रत्येक हसऱ्या बाईत
एक दुखरी वेदना दिसते
गुलाबी ओठांच्या पलीकडे
काळी निळी वेदना हसते.

कुटुंबासाठी ती सतत
धावधाव धावत राहते
तरीही तिच्या कष्टाचे
महत्त्व कोणालाच नसते.

तिचं विश्र्व जणू केवळ
तिचं कुटुंबच असते
तिला तिच्यासाठी जगणं
कधी ठाऊकच नसते.

मनात लपवून अनंत यातना
ती घाण्याला फिरतचं राहते
स्वत:चा आर्त आवाज गाढून
ती मुखवटा लेवून हसते.

खरंच प्रत्येक हसरी बाई
अश्रू पिऊनच जगते
बाईपणाच्या बेडीत अडकून
शेवटी सरणावर चढते.
        *सुधा पाटील*

गुरुवार, २३ जुलै, २०२०

मैत्री

मैत्री स्त्री आणि पुरुषाची.....

      आयुष्याच्या सुंदर वळणांवर जगण्यास उभारी देत असते ती "मैत्री"! जगातलं सर्वात सुंदर नातं कोणतं असेल तर ते मैत्रीचं असतं.यालाही इतर नात्यांप्रमाणे अपवाद असू शकतो.पण जिथं बंधनांचे बांधंच नसतात ते नातं मैत्रीचं असतं.मैत्री याबद्दल काय आणि किती बोलावं तितकं थोडच आहे.पण जिथे मनाची कवाडे नित्य उघडलेली असतात तिथं मैत्रिचं रोपटं अलगद रुजतं.आणि दोन्ही बाजूने जमीन सकस आणि पौष्टिक लाभली तर ते रोपटं एका वटवृक्षात रुपांतरीत होतं.अशी मैत्री चिरकाल टिकते आणि एकमेकांचा आधार बनते.
     पण गहन प्रश्न उभा राहतो ते स्त्री आणि पुरूष यांच्या मैत्री बाबत!पण का?याची कारणं अनेकांची अनेक असू शकतील.कारण जेवढे मानवी जीव या पृथ्वीवर आहेत तेवढे अनुभव आहेत.तसेच तेवढे चष्मे आहेत.त्यामुळे यात मतभिन्नता असू शकते.पण या जगात मैत्री होण्यासाठी कोणती बंधनं नाहीत.विचार,स्वभाव जुळू लागले कि मैत्री होते.मग ती दोन पुरुपांची असू शकते, दोन स्त्रियांची असू शकते किंवा ती एखाद्या स्त्री आणि पुरूष यांची असू शकते.फक्त आता समाजाने ते मान्य करायला हवं आणि आपला चष्मा साफ ठेवायला हवा.खर तर पुरुष आणि स्त्री यांची निखळ मैत्री असूनही त्यावर शंका घेण्याची आपली मानसिकता बनली आहे.कारण हेच कि, प्रेमाचं नातं असेल ते लपवून मैत्री आहे असंच म्हंटल जातं.दुसरं म्हणजे निसर्गतः स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये लैंगिक भाव असल्यामुळे खूपदा ती भावना प्रबळ झाली तर तुमचं मैत्रिचं नातं तितकं विश्वासहार्य राहत नाही.त्यामुळे समाज साहजिकच त्यावर शंका घेऊ लागतो.म्हणूनच स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये मैत्री असेल तर ती "मैत्रीइतकी"मैत्री निखळ कशी राहू शकेल याचाही विचार करायला हवा..... 
     दोन जीवांमध्ये निखळ मैत्री नक्कीच होऊ शकते.पण जर का मैत्रीच्या नावाखाली शारीरिक भावनांची पूर्ती करण्याकडे कल असेल तर ती शुद्ध, निखळ मैत्री होऊ शकत नाही.समाजात स्त्री आणि पुरूष यांच्या मैत्री मध्ये खूपदा हाच भाव दिसून आल्यामुळे समाज या नात्याकडे शुद्ध भावनेने पाहत नाही.पण याचा अर्थ स्त्री आणि पुरुष यांची निखळ मैत्री नसते असं नाही.आजकाल बदललेल्या समाजात अशी निखळ मैत्री आहे.आणि असायलाच हवी.याच कारण असं की, निसर्गतः दोन विजातीय धूर्वांमध्ये आकर्षण असते.याच नियमाप्रमाणे स्त्री आणि पुरुष यांची निखळ मैत्री झाली तर त्यात जास्त विश्र्वसनीयता येण्याची शक्यता असते.तसंच दोन स्त्रीयांच्या बाबतीत संघर्ष जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे एका वैचारिक व्यासपीठावर एक स्त्री आणि पुरूष यांची मैत्री होऊ शकते.... 
    खरं तर अशी मैत्री असू शकते का?याचा विचार करण्यापेक्षा ज्यांना हे विचार पटतात,जे अशी मैत्री असू शकते यावर विश्वास ठेवतात किंवा जे अशा मैत्रीच्या नात्यात आहेत त्यांनी आपलं नातं निभवावं.शेवटी माणसानं तेच करावं जे त्याच्या मनाला पटतं.जर स्त्री आणि पुरूष यांनी आपली मैत्री प्रामाणिकपणे निभावली तर त्यावर आक्षेप कोणी घेण्याचा प्रश्नच येत नाही.आणि तसंही समाजात नेहमीच दोन विचार प्रवाह असतात.आणि ते असणारच.त्यामुळे ज्यांना हे विचार पटतात त्यांनी ते अवश्य आचरणात आणावेत.शेवटी काय, जे टिकाऊ असतं ते टिकतंच! म्हणूनच विचार बदलले कि आपोआप समाज बदलतं जातो.जे जुने विचार सतत गतिमान होऊन पुढे पुढे आले आहेत ते बदलायला हवेत.जर अशी मैत्री हवी असेल तर त्यासाठी मनातील मैत्रभावना बळकट करायला हवी.स्त्री आणि पुरुष यांच्यातील मैत्रभावना पक्की असेल तर समाजही अशी मैत्री नक्की मान्य करेल.शेवटी समाज म्हणजे तरी कोण? आपणचं सारे ना?मग आपणचं स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये असणारी मैत्री मान्य करायला हवी.कारण निसर्गतः भेद नसतोच.भेद आहे तो आपल्या दृष्टीकोनात! म्हणूनच आपला दृष्टिकोन आता बदलूया.उशीरा का होईना पण बदल हा हळूहळू स्वीकारला जातोच.
     वर्षानुवर्षे तेच विचार हस्तांतरित करण्यापेक्षा आधुनिक विचारांची देवाणघेवाण करून समाजाला बदल घडवून आणता येतो.ज्यांना हे पटतं त्यांनी बदलासाठी अवश्य प्रयत्न करावेत.
सौ.सुधा पाटील

माझा अविस्मरणीय क्षण

https://m.facebook.com/story.php?story_fbid=933864237128750&id=652731125242064

My quotes

https://m.facebook.com/story.php?story_fbid=930788537436320&id=652731125242064

स्टेप फादर

🌹स्टेप फादर🌹

    Hii Radha! Meet my step father! A great person in this world! दिपा आनंदाने म्हणाली.राधाचा प्रश्नार्थी चेहरा पाहून दिपा पुढे म्हणाली, what happened Radha? We accept step mother very easily. Then why not step father?
        वरील प्रसंग खरंच विचार करायला प्रवृत्त करतो.आजवर बंधनाची वारेमाप यादी आहे ती फक्त महिलांसाठी.एखाद्या पुरुषाची बायको एक्सपायर झाली की,त्याच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी दुसरी बायको लागते.त्याला मुलं असतील तर मुलांना आई लागते.मुलांना सावत्र आई तरी असावी हा समाजाचा सर्वसाधारण थोर विचार! आणि एक स्त्री सावत्र आई बनून का असेना पण मोडका संसार उभा करते.पण एक विधवा स्त्री असेल,तिला मुलं असतील तर तिच्या मुलांना आधार देणारं खरंच कुणी असतं का?असतीलही मोजकी उदाहरणे पण ती अगदी नगण्य!
    सावत्र आई या समाजाला मान्य आहे.पण एखादा पुरुष सावत्र बाप बनायला कधीच तयार नसतो.दुसरी बायको तर हवी असते.पण तीला मुलं नको असतात.पण एक स्त्री मात्र असा विचार करीत नाही.तीनं एखाद्याचा संसार उभा करावा ही समाजाची मानसिकता बरं का! पण एखाद्या स्त्रीला मुलं असतील तर तीला आणि तिच्या मुलांसहित स्वीकारायला एखादा पुरुष तयार नसतोच.इथेच केवळ व्यावसायिक विचार! आपल्या समाजात सावत्र आई ही संकल्पना चांगलीच रुजली आहे.पण सावत्र बाप हे काहीतरी भलतंच वाटतं लोकांना.म्हणजे काय अन्याय सहन करण्याची मक्तेदारी जणू महिलांचीच अशीच समाजाची मानसिकता आहे.याला अपवाद असू शकतो.पण जीवनाच्या प्रत्येक विचारात बाई ही मागेच असते.कारण बायकांनी हे करणं चुकीचं,ते करणं चुकीचं हे जणू लिखितच आहे.विधूर पुरुषांचा समाज विचार करतो.त्याच्या मुलांचा विचार करतो.पण विधवा महिला किंवा त्यांची मुलं याचा विचार समाज करतो का? सावत्र आई समाजाला मान्य आहे मग सावत्र बाप का मान्य नसावा?खरा प्रश्न तर हा आहे की, सावत्र आई व्हायला माझी भगिनी तयार असते.पण सावत्र बाप व्हायला कोणी तयार नसतो.ही आपली सामाजिक रचना आणि मानसिकता आहे.ती कोणी तयार केली?ज्यांनी महिलांसाठी रुढी परंपरा तयार करून ठेवल्या त्याच महान लोकांनी हेही नियम पुरुषी मनावर बिंबवले असतील ना!
     पण आता काळ बदलला आहे.आपली मानसिकता देखील बदलायला हवी.समस्या,गरजा ह्या एक स्त्री असो किंवा पुरुष दोघांच्या असतात.म्हणूनच एक स्त्री पुरुषाचा संसार पुन्हा उभा करते तर मग सावत्र बाप बनून एखाद्या पुरुषाने एखाद्या निराधार स्त्रीचा संसार पुन्हा का उभा करू नये?जीव लावता आला की कोणाचीही आई आणि किंवा बाप होता येतं.गरज असते ती विचारांची आणि प्रेमळ हृदयाची!
सौ.सुधा पाटील

स्वमूल्यांकन

स्वमूल्यांकन....

    माणूस एक अजब केमिस्ट्री असते.कितीही संशोधन केले तरी या केमिस्ट्री चे गुणधर्म सापडणं कठीण!
    खूपदा माणसं काहीतरी वाईट घडलं की सरळ सरळ म्हणतात, माणूसकी संपली आता.पण इतरांकडून माणूसकीची अपेक्षा करताना आपल्या आतमध्ये खरंच आपण डोकावून आपल्यातील माणूसकी आपण शोधतो का?हा खरा विचारांचा मुद्दा आहे.आपण आधी आपल्यातील माणूसकी जीवंत ठेवली की आपोआपच इतर थोडा तरी माणूसकीचा विचार करु लागतात.इतरांचे दोष उगाळीत बसण्यापेक्षा आपल्या मध्ये असणारे दोष तपासून पाहिले तर आपणच समृद्ध होत जातो.पण माणूस हा स्वच्या चुका कधी मान्यच करीत नाही.मात्र इतरांच्या चुका शोधत बसतो.खर तर जेव्हा माणसाला स्वत: मधील चूका सापडू लागतात किंवा त्या चुका तो मान्य करु लागतो तेव्हाच तो बदलू शकतो.स्वत:मध्ये सुधारणा करु शकतो.माणूसकीची अपेक्षा इतरांकडून करण्याआधी ती आधी आपल्यात असावी लागते.आधी आपण एक हात पुढे करावा लागतो.मग इतर हात आपोआप हळूहळू पुढे येत राहतात.ज्यांचा दृष्टिकोन कधीच बदलत नाही त्यांना सरळ त्याच्या विचारसरणी सोडून द्यावे.माणूस जेव्हा स्ववत:च मूल्यमापन स्वत: करू लागतो तेव्हा त्याला इतर नजरांची गरज भासत नाही.म्हणूनच बदलाची सुरुवात स्वपासून असावी.

Beautiful nature















My quotes

https://m.facebook.com/story.php?story_fbid=943333166181857&id=652731125242064

चल सखे...

https://m.facebook.com/story.php?story_fbid=943364386178735&id=652731125242064

पाऊस समजायला..

https://m.facebook.com/story.php?story_fbid=944894686025705&id=652731125242064

बुधवार, २२ जुलै, २०२०

प्रेमाची अष्टाक्षरी

🌹I love you 🌹

      "I love you"ही अष्टाक्षरी म्हणजे मानवी जीवनातील ओअॅसीस! एखादा वाईट क्षण असावा आणि कोणीतरी मानसिक आधार देऊन म्हणावं, don't worry. I love you.मनाला उभारी येते.माझं तुझ्यावर प्रेम आहे.असं कोणीतरी म्हणालं तरी काही क्षण मन पाखरू तरंगायला लागतं.कारण या अष्टाक्षरी वाक्यात प्रचंड जादू आहे.माणसाला जगायचं बळ, पुन्हा उभारी घेण्यासाठी ओलावा यातून मिळतो.
खरं तर, मला पूर्वीचा काळ आठवतो आणि हसू येतं.कारण हे वाक्य जणू प्रियकर आणि प्रेयसी यांचीच मक्तेदारी होती.कोणी हे वाक्य उच्चारले तरी त्याला मार बसायचा.मग बिचारी झाडे,नदीकाठचे, समुद्र काठचे दगड,लेण्या प्रेमी जणांच्या प्रेमाच्या अभिव्यक्तीचं साधन बनायच्या.चोरी चोरी चुपके चुपके प्रेमाची अभिव्यक्ती व्हायची.त्यावेळचं साहित्य देखील खरं,त्यागावर आधारित प्रेम याच सुंदर वर्णन करीत असे.नकळत तसेच संस्कार पिढीवर होत होते.पण त्यातही लोकांना गोडी वाटायची.सुंदर, गुलाबी प्रेम पत्रांचा तो काळ होता! I love you! हे वाक्य सर्वच नात्यातील प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी कधी ते वापरले जातचं नसे.त्या वाक्याचा उघड उघड उच्चार जणू गुन्हाच होता.
     पण काळ बदलला.आणि या वाक्याचही आधुनिकीकरण झालं.आज आपण आई,बाबा,ताई, मित्र,प्रियकर, प्रेयसी सर्वांनाच I love you.असं म्हणू शकतो.आज कोणीही हे वाक्य उच्चारले म्हणून आक्षेप घेत नाही.व्हलेंटाइन डे ला आपण आपल्या सर्वांवरील प्रेमाची अभिव्यक्ती करू शकतो.आपलं निसर्ग प्रेम व्यक्त करताना देखील आपणI l love nature. I love animals.असं सहजच म्हणतो.
     पण जरा विचार करा की! हे केवळ एक वाक्य नाही.ही केवळ अष्टाक्षरी नाही. या वाक्यात आहे भावनांचा सागर!यातच आहे आधाराचा हात!यातच आहे प्रचंड आपुलकी, ओलावा, काळजी! केवळ या वाक्याची अभिव्यक्ती म्हणजे प्रेम नव्हे.बऱ्याचदा या वाक्याची अभिव्यक्ती न होताही प्रेम दिसून येत.आणि शंभरदा केवळ या वाक्याचा जप असणाऱ्या ठिकाणी हे प्रेम दिसून येत नाही.जेव्हा तुम्ही हे वाक्य कोणासाठी तरी उच्चारता तेव्हा तुम्ही कर्तव्यात बांधले जाता.जिथे खरंच प्रेम असतं तिथे ते कृतीतून दिसून येत.ते वाक्य साधंसुधं वाक्य नाहीच.त्यात आहे काळजी, आपुलकी, जपणं,आदर करणं.तिथे असते माफी!तिथे असतो त्याग!या साऱ्या गोष्टी जिथे दिसतात तिथेच या वाक्याची अभिव्यक्ती सार्थ ठरते.नाहीतर केवळ पोकळ शब्दांची जुळवाजुळव!
  हल्लीची तरुण पिढी तर क्षणाक्षणाला उगीचच या शब्दाचा वारेमाप उल्लेख करताना दिसते.त्या वाक्याची गहनता, जबाबदारी न कळणारी माणसं कधीच खरी नाती जोडू शकत नाहीत.पोकळ शब्द जसे वाऱ्यावर विरुन जातात तसेच अशी नाती क्षणात संपतात.म्हणूनच आज तरुण पिढीचे तासाला इथे ब्रेकअप होताना दिसतात.म्हणूनच त्याना "I love you" हे केवळ शब्द नसून जाणिवांचा,कर्तव्यांचा सागर आहे.हे वेळीच समजायला हवं.तारुण्यसुलभ आकर्षणाला तरुण पिढी प्रेम समजते.यातूनच I love you.या वाक्याने वह्यांची पानं सजतात.हळतात सजतात.टॅटू कोरले जातात.पण मनात खरा भाव कोरला जाईलच याची शाश्वती तशी कमीच असते.त्यातच कित्येक लोकं आपला स्वार्थ साधण्यासाठी या अनमोल वाक्याचा शस्त्र म्हणून वापर करताना दिसतात.अशांसाठी हे वाक्य केवळ अक्षरांची रचना असते.ईश्वरनिर्मित यातील उच्चतम भाव अशा राक्षस वृत्तीच्या लोकांना कधीच समजतं नाही.अशी माणसे सदैव दरिद्रीच राहतात.आज कित्येक मानवी जीव यात फसवणूक झाल्याने नाहक बळी जातात.म्हणूनच या सुंदर भावनेची परिभाषा सर्वांनी समजून घ्यायला हवी.जिथे आहे तसा स्वीकार होऊन या वाक्याची अभिव्यक्ती होते तिथेच खऱ्या अर्थाने प्रेमभाव फुलतो.
     म्हणूनच "I love you" या सुंदर रचनेत दडलेला परमोच्च आनंद,भाव,समर्पन समजून घेता आलं की,जीवनाचे रस्ते प्रकाशून जातात.
   सौ.सुधा पाटील सांगली

पृथ्वीची शतकोत्तर पाळी

🌹पृथ्वीची शतकोत्तर पाळी 🌹

     "मासिक पाळी"म्हंटलं की, डोळ्यासमोर येते स्त्री, तीचं मातृत्व, नवनिर्माण आणि अवघ्या मानवजातीचं उगमस्थान! निसर्गाने स्त्रीला मासिक पाळीचं वरदान दिलं.त्यामुळेच तर मानवाचा अंश निर्माण होत असतो.ज्यावेळी गर्भाशयात गर्भ नसतो  यावेळी गर्भाशयातील अस्तर एक टाकाऊ पदार्थ असतो.तो दर महिन्याला स्त्रियांच्या शरीरातून बाहेर टाकला जातो.हे चक्र सतत सुरू असतं.या पाळीमुळे स्त्री मुलं जन्माला घालू शकते.तसंच दर महिन्याला हा टाकाऊ पदार्थ बाहेर टाकल्यामुळे ती अंतर्बाह्य स्वच्छ,उत्साही,कार्यक्षम आणि प्रसन्न बनतं असते.
     आजची पृथ्वीवरील परिस्थिती पाहता सहजच मनात विचार आला की, आपल्या पृथ्वी मातेला पाळी तर आली नसेल!एका स्त्रीला दर महिन्याला पाळी येते.पण जेव्हा जेव्हा निर्मिती थांबते, पृथ्वीच्या गर्भात टाकाऊ पदार्थांचा साठा वाढतो तेव्हा तेव्हा अंतर्बाह्य स्वच्छ होण्यासाठी पृथ्वी मातेची पाळी होतं असावी.सारी मानव जात, पशुपक्षी,झाडेवेली सारा निसर्ग तिची बाळं आहेत.सर्वांनाच ती प्रेमानं जतन करते.पण मानव रुपातील बाळं मात्र तिला खूप त्रास देतात.तिचं सौंदर्य हिरावून घेतात.स्वत:च्या हिंसक, चंगळवादी सवयीतून मानवाने तिच्या गर्भात अफाट असा टाकाऊ पदार्थांचा साठा वाढवला आहे.म्हणूनच की काय, तिनं तिची पाळी बाहेर टाकायला सुरुवात केली आहे.जेव्हा नवनिर्माण थांबतं तेव्हा तेव्हा टाकाऊ पदार्थ बाहेर टाकून पुन्हा पुनर्निर्माण करण्यासाठी तयारी करावी लागते.हाच निसर्ग नियम आहे.आणि याघडीला तेच घडतंय.
     आज सारा निसर्ग स्वच्छ,उत्साही झालाय.नद्या,नाले निर्मल झालेत.कित्येक वर्षांनी गंगा माता हसत खेळत स्वच्छ बनून बागडत आहे.मला वाटतं जेव्हा जेव्हा पृथ्वी मातेला टाकाऊ पदार्थांचा साठा असह्य होतो तेव्हा तेव्हा तीची अनेक शतकांनी पाळी येत असावी.त्यामुळे ती सारे टाकाऊ पदार्थ या शतकोत्तर पाळीच्या रुपाने बाहेर टाकून पुन्हा नव्या जोमाने नव शतकांच्या निर्मितीसाठी तयार होत असावी.त्यामुळे पृथ्वीची ही अवस्था जेव्हा संपेल तेव्हा सर्वत्र एक नवा जोश असेल.नवचैतन्य असेल.कित्येक मनं स्वच्छ होतील.पृथ्वीची अंतर्बाह्य स्वच्छता झाल्याने सारा आसमंत चिरतरुण भासेल.झाडाची पानं गळून नवपालवी फुटलेल्या सुंदर वृक्षासारखी आपली पृथ्वी पुन्हा नवकुमारीका बनेल.निसर्ग लहान,हसऱ्या, गोड बाळासारखा वाटेल.पुन्हा साऱ्या चराचरात चैतन्याचे घट बरसतील.
     म्हणूनच आपल्या पृथ्वीची शतकोत्तर पाळी सुरू आहे.ती सर्व टाकाऊ पदार्थ बाहेर टाकून स्वत:ला पुन्हा नवचैतन्याने आपल्यासाठी तयार करीत आहे.याची जाणिव ठेवून या संकटाकडे सकारात्मक दृष्टीने पाहूया.आजार अति झाल्यावर प्रत्येक जीवाला विश्रांती हवी असते.अगदी तसंच पृथ्वीवरील भार, प्रदुषण, तापमान,हवेदावे सारंच अती झालं. म्हणूनच तर पृथ्वी माता आज या आजारातून बाहेर येण्यासाठी विश्रांती घेत असावी.आपणही तिला समजून घेऊन संयम राखुया.तीची ही विश्रांती खरं तर आपल्या भावी आनंदासाठीच तर आहे.ती एक प्रेमळ माता... आपल्या भावी सुंदर आयुष्यासाठी वेळोवेळी योग्य असा निर्णय घेत असते.पण हे आपणास समजायला हवं.चला तर मग आपल्या पृथ्वी मातेची काळजी घेऊया.
सौ.सुधा पाटील सांगली (8459730502)

टिळक आजी...

🌹उत्साहाची अखंड सरिता 🌹

     उत्साह! म्हणजे जणू सळसळता वारा, रिमझिम पाऊस धारा... उत्साह म्हणजे जणू जीवनातील जिवंतपणाच!मानवी जीवन अखंड तेवत ठेवतो ते त्याच्यातील उत्साह! उत्साह मानसाला सदैव टवटवीत ठेवतो.उत्साही माणसंच चिर तरुण राहतात.क्षणा क्षणात जीवन जगतात आणि जीवनाला सजीव ठेवतात.अशा लोकांकडे पाहिलं कि, इतरांनाही जीवन जगताना संजीवनी लाभते.
    अशाच उत्साहाची अखंड सरिता आहेत टिळक आजी!वय वर्ष ऐंशी.पण उत्साह जणू तरुणींना लाजवेल असा.आजही त्या सदैव गोड,हसऱ्या चेहऱ्याने सर्वांचं स्वागत करतात.नातीला, सुनेला, लेकाला आणि नवऱ्याला न थकता अनेक पदार्थ उत्साहाने करून घालतात.आजीनी पाककृती, विविध आईस्क्रीमचे नमुने,घरच्या घरी स्टार्च करणे असे क्लासेस खूप वर्षं घेतले.आज एवढ वय असूनही सुमन आजी नित्य घरात व्यस्त असतात.घरातील प्रत्येक वस्तू निटनेटकी ठेवतात.घरच्या सोफ्यासाठी स्वत: पसंतीने कापड खरेदी करून कव्हर आजही त्या स्वत: शिवतात.
    आजचं ओजश्रीचा वाढदिवस होता.ओजश्री म्हणजे माझी मानस कन्या आणि आजीची नातं! आजीने सकाळपासून तयारी करून सुनेच्या मदतीने सर्वांसाठी रगडा पॅटीस आणि मॅंगो फ्रुट सॅलड बनवलं होतं.साऱ्यांनी आजीच भरभरून कौतुक केलं.मी तर आजीच्या या उत्साहाने उत्साहमयचं झाले.याही वयात आजी प्रत्येक गोष्ट न थकता आनंदाने करते.ती स्वत: सदैव अपडेट असते.गौर वर्ण, सडसडीत बांधा, सदैव हसरा चेहरा आणि क्षणाक्षणात ओसंडून वाहणारा उत्साह यामुळे सुमन आजी सर्वांच्या मनात जीवंतपणा निर्माण करते.आळसावलेल्या, निरुत्साही तरुण पिढीसाठी आजी एक सकारात्मक एनर्जी देणारी उत्साहाची सरिताच आहे.तिच्या सानिध्यात जीवन एक सुंदर गाणं वाटतं.आजही ती आधुनिक काळात समरस होऊन जगते.ती कुठेही पिढीतील अंतरात अडकत आहे.नवीन गोष्टींचा आनंद घेते.नाविण्याचा पुढाकार करून आजमध्ये जगणारी आजी खरंच तरुण पिढीला एक आदर्श आहे.
सौ.सुधा पाटील सांगली (8459730502,)

एकदा पावसात भिजून बघ

एकदा पावसात भिजून बघ
मस्त त्याला लपेटून बघ

पाऊस कोसळतो धरावर
आठवणी तरंगतात मनावर
तो मोरपीस क्षण पुन्हा आठवून
रोमांच उभारतो तनावर
म्हणूनच एकदा पावसात भिजून बघ...

दूरवर त्या डोंगरावर पाऊस कोसळतो
क्षितिजावर आनंदाने उधळतो
अन् धरतीला प्रेमामृत पाजतो
मग धुंदीत प्रेमाच्या धरती
हिरवा शालू नेसते
अन् आकाशाशी जणू एकरुप होते
म्हणूनच एकदा पावसात भिजून बघ...

पाऊस असतोच आबालवृद्धांना सुखावणारा
प्रेमवीरांना चिंबचिंब भिजविणारा
पक्षांना, पंखावर पाऊस घेऊन
आनंदाने घिरट्या घालायला लावणारा
मोराला धुंदीत नाचायला सांगणारा
अन् मानवी मनाला भिजवून शांत करणारा
म्हणूनच एकदा पावसात भिजून बघ..

तो कोसळतो धुंद होऊन
अन् जातो सृष्टीला चैतन्य देऊन
तुझं माझं साऱ्यांच गुपीत ओलंचिंब करून
म्हणूनच एकदा पावसात भिजून बघ
मस्त त्याला लपेटून बघ....

         सौ.सुधा पाटील




रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती..     बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्...