शनिवार, २३ ऑगस्ट, २०२५

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती..

    बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्त्रीसाठी मैत्रिणच असते.त्यामुळेच तिचं आरोग्य उत्तम राहू शकत.तीला मातृत्व प्राप्त होतं.ही मासिक तिच्या जीवनात आल्यापासून जवळ जवळ तीस वर्षे आणि जितकी मुले झाली तितके महिने त्या तीस वर्षात मिळवून जितकी वर्षे होतात तितकी वर्षे मासिक पाळी एका बाईच्या आयुष्यात असते.त्यामुळे ती प्रत्येक महिलेची जीवाभावाची सखी असते.ती जीवनात असताना काही जणींना काही शारीरिक व मानसिक त्रास होतात.पण आपण आहार विहार याची नीट काळजी घेतली,स्वच्छतेची काळजी घेतली तर ती अगदी सहज आपल्या आयुष्यात राहते.याविषयी सविस्तर माहिती मी मागे चार भागांमध्ये लिहिली आहे.
    परंतु या सखीचा परतीचा काळही काही काही महिलांना त्रासदायक असू शकतो.पण काही काही महिलांच्या आयुष्यात ही सखी अगदी संथ नदीसारखी येते.आणि तितक्याच शांतपणे निघून जाते.रजोनिवृत्तीचा कालावधी साधारण तीन ते चार वर्षांचा असतो.म्हणजे एकदा हा सुरू झाला की तो तीन ते चार वर्षांनी संपतो.आणि मग ही मासिक सखी कायमची आपल्या आयुष्यातून निघून जाते.पण सख्यांनो ती आयुष्यात असते तेव्हा आपणास ती कटकट वाटते.पण तीचं जाणं आपल्या आयुष्यात पोकळी निर्माण करुन जातं.जणू आपलं स्त्रीत्व काहीस दुबळं पडतं.रजोनिवृत्ती म्हणजे काय?त्या काळात स्त्रियांना कोणत्या शारीरिक, मानसिक बदलांना सामोरे जावे लागते.याची माहिती करून घेतली कि, रजोनिवृत्तीला सहज स्विकारता येतं.आणि या काळात प्रत्येक बाई या बदलातून जातच असते.याची जाणिव झाली की मग त्रास कमी होतो.कारण या काळात मानसिक आरोग्य उत्तम ठेवणं गरजेचं असतं.
रजोनिवृत्तित होणारे बदल......
*हा काळ सुरू झाल्यानंतर मासिक पाळी अवेळी येते.कधी ती दोन ते तीन महिन्यांनी येते किंवा महिन्यात दोनदा येते.अंगावरुन खूप जास्त जातं.तर कधी कधी खूपच कमी जातं.
*या काळात प्रजनन संस्थेच्या अवयवांच आकुंचन होत असतं.योनीतील ओलसरपणा कमी होतो.त्यामुळे लैंगिक संबंध ठेवताना महिलांना त्रास होतो.त्यातच महिलांची कामभावना कमी होत असते.रजोनिवृत्ती नंतर काही महिला कामजीवनाकडे दुर्लक्ष करु लागतात.त्यामुळे वैवाहिक जीवनात कुरबुरी सुरू होतात.यावर दोघांनी एकमेकांना समजून घेऊन उपाय शोधावेत.
*काही महिलांना कॅल्शियम कमी झाल्याने कंबर दुखी,गुडगे दुखी,अंग दुखी, पोट दुखी, किंवा शरीराचा एखादा अवयव दुखणे अशा तक्रारी सुरू होऊ शकतात.पऱतु प्रत्येक महिलेची शरीर रचना भिन्न असल्यामुळे ही लक्षणें भिन्न असू शकतात.
*या काळात मानसिक बदल खूप होतात.कारण इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्राॅन  ही महत्त्वाची संप्रेरके शरीरात स्त्रवायची बंद होतात त्यामुळे महिलांच्या शरीरात होणारे बदल स्विकारणे त्यांना कठिण जातं.वजन वाढतं.चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात.केस गळतात.चिडचिड वाढते.कामात उत्साह राहतं नाही.काही महिलांना गालावर किंवा हनुवटीवर किंवा ओठांच्या वर मिशांसारखे केस येतात.म्हणूनच आपलं सौंदर्य आता कमी होणार ही भावना महिलांच्या मनात निर्माण होते.त्यामुळे त्या मनातून खचतात.
    परंतु वरील सर्व लक्षणे सर्वच महिलांमध्ये दिसतील असे नाही.उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य असणाऱ्या महिलांना रजोनिवृत्ती कधी संपली हेही समजत नाही.इतकी ती सहजपणे संपते.आपली रजोनिवृत्ती कधी सुरू होणार हे प्रत्येक महिलेने लक्षात घेऊन तशी काही लक्षणं जाणवू लागली तर ती सहजपणे स्विकारावीत.त्याचा बाऊ करु नये.आपला आहार संतुलित ठेवावा.दररोज थोडा व्यायाम करावा.याविषयी आपला जोडीदार, मुलं यांच्याशी स्पष्ट बोलून त्यांची कामात मदत घ्यावी.म्हणजे चिडचिड होणार नाही.आपले छंद जोपासून या काळात मन प्रसन्न ठेवावे.जाणिवपूर्वक आपण काळजी घेतली तर आपणास रजोनिवृत्तीचा त्रास कमी होईल.
   चला तर मग आपल्या सखीची पाठवणी हसत हसत करुया.स्वत:ला कणखर बनवूया.जीवनाचं सारं सुख मनावर असतं.म्हणूनच मनास प्रसन्न आणि चिरतरुण ठेवा.म्हणजे मग रजोनिवृत्ती नंतरचं आयुष्य सुंदर जगात येईल.प्रत्येक बाईला यातून जावं लागतच.त्यामुळे रजोनिवृत्तीची लक्षणे समजून घेऊन आपण हा काळ सहजपणे हाताळू शकतो.त्यानंतरचा काळ पुन्हा नव्याने जगता येतो.तर मग आपल्या सखीचं आगमन तितक्या आनंदाने केलं तितक्याच आनंदाने तीची पाठवणी करून पुढील आयुष्य स्वत:चे छंद जोपासत आनंदाने जगूया.
.......शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
सौ.सुधा पाटील.

मनाच्या पत्रिका

#मनाच्या_पत्रिका
...........लग्नाचा मौसम सुरू झाला आहे.. वधूवरांच्या पत्रिका बघणं,किती गुण जुळतात हे बघणं...मग लग्न बांधायची का नाही याचा विचार करणं..
हे सारं सुरु झालं आहे.पण खरंच पत्रिका बघणं गरजेचं असतं का?आणि किती गुण जुळले तर लग्न बांधावी हे कोणी ठरवलं?ज्यांचे जास्तीत जास्त गुण जुळतात ते खरंच मनापासून एकत्र राहतात का? याचा देखील एक रिसर्च व्हावा आणि त्याची देखिल अनुमाने काढली जावीत असं मला वाटतं.😀...
कारण मी काही जणांकडून ऐकलं आहे.... छत्तीसच्या छत्तीस गुण जुळून एका जोडप्याचा घटस्फोट झाला.आणि ज्यांनी पत्रिकाच पाहिली नव्हती त्यांचा संसार सुखाचा सुरु आहे.मुळात लग्न बंधनाने दोन भिन्न स्वभावाचे जीव, दोन भिन्न संस्कृतीत वाढलेले जीव एकत्र येऊन सहजीवनाची सुरुवात करीत असतात.त्यामुळे अर्थातच एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या आवडीनिवडी जपणं किंवा त्यांच्या आड अडथळा न बनणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.मुळात मनाच्या पत्रिका जुळणं आधी महत्वाचे असते.पण काळ बदलला तरी त्या कोणी बघतंच नाही.आजकाल वाढलेल्या अपेक्षा, अजूनही जपली जाणारी पुरुष प्रधान संस्कृती यामुळे लग्न होणं अवघड...आणि झाली तरी ती टिकणं हल्ली अवघड होऊन बसले आहे....
मुळात कर्मकांडे करणं, मुहूर्त बघणं ,अशा गोष्टी मानसिक दुबळेपणा,भीती यापोटी केल्या जातात.खूपदा मनातली भीती, अविश्वास याला कुठेतरी स्थैर्य मिळाव यासाठी देखील काही गोष्टी केल्या जातात.थोडक्यात काय तर,एखादी गोष्ट घडणाऱ्या वेळीच घडणार असते, पण जर का कोणी त्याबद्दल काही भाकीत केलं तर माणूस तोवर मनाला शांत ठेवतो.हाही नकळत एक मानसिक स्थैर्याचा प्रकार म्हणायला हरकत नाही.पण त्यांच्या किती आहारी जायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं.
असो... लग्न करताना,जर तरुण पिढी देखील पत्रिका बघणं पसंत करत असेल किंवा त्यावर विश्वास ठेवत असेल तर मात्र अजूनही विक्षान युग दूर आहे.अजूनही समाज अज्ञानी आहे असंच म्हणावं लागेल. पण जोपर्यंत मनाच्या पत्रिका जुळत नाहीत तोवर खऱ्या अर्थाने छत्तीस गुण जुळतंच नाहीत. कागदावरच्या गुणांपेक्षा स्वभावाचे गुण जुळून येण खूपच गरजेचे असते.
     एक काळ होता जेव्हा दिलेला शब्द पाळण्यासाठी,किंवा पाहुण्यातील आहे म्हणून लग्नं व्हायची. जास्त मुली होत्या त्या कुटुंबातील पालक लग्नं प्रकारची म्हणून जास्त काही न पाहता लग्नं करुन द्यायची.पण तेही संसार झाले...रेटले. पण तिथे कुठेही पत्रिका आड आली नाही. थोडक्यात काय तर...संसारासाठी दोन सक्षम मने लागतात. पण आज माणसं लग्न टिकण्यासाठी हव्या असणाऱ्या गोष्टी न पाहता पत्रिका पाहतात आणि त्यावरच जास्त विश्वास ठेवतात. विज्ञान युगातही वेल एज्युकेटेड माणसंही केवळ पत्रिका जुळत नाही म्हणून सर्व बाजूंनी योग्य असणार स्थळ सोडत असतील तर अवघड,आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे? ...मग माझा समस्त वर्गाला एक प्रश्न आहे....स्थळ चांगलं नाही...पण पत्रिका शंभर टक्के जुळते अशा ठिकाणी लग्न जुळविले का?...अर्थात सर्वांच उत्तर नाही असंच असणार...
फक्त विचार करा....
लग्नं ही प्रेमावर...
समजुतीवर...आणि एकमेकांना दिल्या जाणाऱ्या आदरावरच.....परिपक्व होत जातात...
लेखिका,समुपदेशक
सौ.सुधा पाटील

शनिवार, ३१ मे, २०२५

प्रेमात पडतात...

🌹तरुण मित्र मैत्रिणींनो...प्रेमात पडताय..🌹
    आजकाल प्रेमात पडणं जणू फॅशनच झाली आहे.फिल्मि स्टाईल मारत तरूण तरूणी प्रेमात पडतात.ते काल्पनिक विश्व आणि आपलं वास्तव विश्व याची फारकत होऊ लागली की, लगेच यांचं प्रेम संपतं.सुरू होते मग नवी शोध मोहीम.खर तर हा लकी ड्रा सारखा प्रकार झाला आहे.कधी मुलगा फसवणूक करतो.तर कधी मुलगी फसवणूक करते.तर पालक आड येतात.
     परवाच एक मुलगा म्हणाला, मॅडम प्रेमात मुलीचं फसवणूक करतात.घरच्यांचा विरोध दिसला की लगेच पलटी मारतात.मी हसुन म्हणाले,अरे पुरुष प्रधान संस्कृतीत मुलींना आजही पालकांच्या बंधनात रहावं लागतं.पळून जाऊन लग्न करण्याचं धैर्य सर्व प्रेमी युगलांमध्ये नसतं.पण आजकाल मुलगा फसवतो की मुलगी यापेक्षा प्रेमात निष्ठा कमी आणि फसवणूक जास्त होतं आहे.पण का?याचाही विचार होणं गरजेचं आहे.एक तर केवळ प्रेमावर जीवन जगता येतं नाही.प्रेमात पडणं म्हणजे जबाबदारी स्वीकारणं असतं.हेच तरुण पिढीला समजतं नाही.आईबापाच्या पैशावर रोमांस करत फिरणं म्हणजेच प्रेम अशीच काहीशी गोड समजूत तरुण पिढीची असते.कुठेतरी वाचलेलं उदाहरण....एक मुलगा केवळ प्रेयशीच्या प्रेरणेने यु.पी.एस.सी.परीक्षा पास झाला.आणि ती मुलगी सी.ए.झाली.नंतर दोघांनी लग्न केलं.याला म्हणतात,प्रेमाला शक्ती बनवणं.प्रेमाची परिभाषा समजून घेऊन प्रेम करणं.
    आजकाल मुला मुलींना प्रेम म्हणजे केवळ खेळ वाटतो.पण बाळांनो या खेळात तुम्ही एकमेकांचं जीवन उद्ध्वस्त करता.जरा विचार करा.तुमच्या फसवणुकीमुळे कोणीतरी आयुष्य संपवू शकतं.प्रेमावरचा लोकांचा विश्वास उडू शकतो.तुमची पिढी प्रेमापेक्षा भौतिक गोष्टीं, गिफ्ट यातच जास्त अडकते.कित्येक मुली आज पैशासाठी मुलांना फसवतात.मुलं लैंगिक सुखासाठी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात.प्रेमाच्या नावाखाली असं घडतं असेल तर समाज तरी तुम्हाला का समजून घेईल?
    म्हणूनच माझी तरुण पिढीला नम्र विनंती आहे की,कृपया प्रेमाला कलंक लागेल असं वागू नका.प्रेम माणसाला घडवतं.आणि जगणं शिकवतं.आणि तेच प्रेम असतं.जिथंअपेक्षा, व्यवहार येतो तिथं प्रेम नसतंच.पडताय प्रेमात.... अवश्य पडा...पण डोळे उघडे ठेवून.नाहीतर खुशाल खड्ड्यात पडा.तुमच्या थिल्लरपणा मुळे लोकं सरळ सरळ म्हणणार आजची तरुण पिढी वाया जात आहे.प्रेमाला कलंकित करीत आहे.लैला मजनूच्या नुमत्या गप्पा मारु नका.तसं प्रेमही करा.नाहीतर त्यात पडूच नका.कारण तुमच्या खेळामुळे कोणीतरी संपून जातं.असं आदर्श प्रेम करा की, इतरांनी तुमच्या कडे बोट दाखवलं पाहिजे.प्रेमात निष्ठा हवी.एकमेकाविषयी आदर हवा.तरच ते प्रेम यशस्वी होतं.मुलींनाही कळकळीची विनंती...कृपया एखाद्या गरीब मुलाच आयुष्य, करिअर बरबाद करु नका.समाजात कितीतरी उदाहरणे घडली आहेत की, श्रीमंत मुलगी घरच्यांच्या विरोधाला बळी पडते.आणि त्या मुलाचं,त्याच्या कुटुंबाचं नाहकच अस्तित्व संपतं.अशांना मी सरळ सरळ म्हणेन की, तुम्ही प्रेमाच्या वाटेवर जाऊ नका.पालकांनी देखील आपल्या पाल्यांना समजून घ्याव.कोणाच तरी आयुष्य उद्ध्वस्त करायला आपणही तितकेच जबाबदार असता.
   म्हणूनच माझ्या तरुण मित्र मैत्रिणींनो आधी प्रेमाची परिभाषा समजून घ्या.प्रेम आणि करिअर यांची सांगड घाला.आणि स्वत:च्या हिमतीवर प्रेम यशस्वी करा.फिल्मी भूलभुलैया यात अडकू नका.फिल्मी प्रेम आणि वास्तव प्रेम यात फरक असतो.फिल्मी प्रेम तीन तासाचंच असतं.पण तुमचं प्रेम आयुष्यभर टिकवायचं असतं.
सौ.सुधा पाटील सांगली (8459730502)

कविता वाचन..

 





पालक आणि मुलांचे शिक्षण

🌹पाल्यांचे शिक्षण आणि पालकांची मानसिकता 🌹
     शिक्षणानं माणूस सुशिक्षित बनतो.जीवन यशस्वी बनवणं, जगातील ज्ञानाचा साठा आत्मसात करणं, विचार करून जीवन सुकर बनवणं शिक्षणानं शक्य होतं.त्यामुळे शिक्षणाकडे आधुनिक पालकांचा ओढा वाढला आहे.प्रत्येक पालकाला वाटतं की, आपलं पाल्य खूप शिकावं, मोठं व्हावं.यासाठी आजचा पालक धडपडत आहे.त्यासाठी तो हवा तितका पैसा खर्चायला तयार आहे.बरेच पालक ज्यांना आपलं शिक्षण पूर्ण करता आलं नाही त्यांना वाटतं की,काहीही होवो पण आपल्या मुलांनी शिकायला हवं.मग त्यासाठी पालक महागड्या शाळेत अगदी कर्ज काढून मुलांना घालतात.भरमसाठ फी अगदी लहान गटापासून भरली जाते.जेव्हा उच्च शिक्षण घ्यायची वेळ येते तेव्हा त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत अशीही वेळ येते.
   पण खरं शिक्षण म्हणजे काय? शिक्षणाच्या व्याख्या काहीही असोत पण जीवन जगताना तुमचे सर्व व्यवहार तुम्हाला उत्तमरित्या करता येणं म्हणजे शिक्षण! खरं तर एखादी नोकरी मिळवण्यासाठी सर्टिफिकेट लागतं आणि म्हणूनच हा शिक्षणाचा उहापोह केला जातो.नाहीतर शाळाविना शिक्षण घेता येतं.जीवन जगताना प्रत्येक क्षण आपणांस काहीतरी शिकवून जातो.ते सारं शिक्षणच आहे.एका कार्यक्रमात राठोड नावाचे शिक्षक म्हणाले की,मला माझ्या मुलांना माणूस म्हणून जगता येईल असं शिक्षण द्यायचं आहे.खरं आहे, माणूस म्हणून जगायला शिकवत ते खरं शिक्षण!
    पण हल्ली शिक्षणाकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे.आपल्या पाल्यांन ज्ञान घेतलं की केवळ परीक्षेपुरती माहिती घेतली याचा विचार केला जात नाही.विविध परीक्षा,माहितीचा भरणा, मार्क्स जास्तीत जास्त मिळवणं याची जणू शर्यतचं चालली आहे.आपल्या आजूबाजूला,घरात निरिक्षणातून अनेक गोष्टी मुलांना शिकवता येतात.पण शिक्षण जणू पुस्तकांशिवाय, भरमसाठ मार्कांशिवाय नसतंच असं पालकांना वाटतं.मला तरी वाटतं की, दहावीपर्यंत तरी पालकांनी महागड्या शाळेत मुलांना घालून उगाचंच पैसा खर्च करु नये.खरी पैशाची गरज तर दहावीनंतर असते.पण अनेक पालकांचा असा गैरसमज आहे की, महागड्या शाळेत मुलांना घातलं तरच त्यांचं शिक्षण होईल.पण शाळा कोणतीही असो मुलं त्यांच्या गतिनुसार कुठेही स्वत:च शिकत असतात.मला इथं डार्विन या शास्त्रज्ञाचं उदाहरण सांगावसं वाटतं.ज्या डार्विनने जगाला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत दिला,तो शाळेत रमला नाही.प्रगती अगदी कमी.त्याच्या वडीलांनी हा काही शिकणार नाही म्हणून त्याला धर्मोपदेशक होण्यासाठी पाठवले.त्यावेळी त्याला प्रवास करताना निसर्गाची गोडी लागली.प्रचंड निरिक्षण करून त्याने निसर्गातील अनेक सजीवांचे सांगाडे गोळा केले.आणि अनेक वर्षे निरिक्षण आणि अभ्यास करून जगाला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत दिला.सांगायचा मुद्दा हा की, मुलं स्वयंप्रेरणेने जास्त शिकतात.आणि त्यांची आवड जेथे तेथेच ते रमतात,प्रगती करतात.पण आजकाल पालक आपली स्वप्ने मुलांवर लादताना दिसतात.तसंच स्वत:च्या स्टेटससाठी मुलांवर अनेक गोष्टी लादतात.इतर मुलांशी तुलना करतात.पण पालक हे विसरतात की,प्रत्येक मूल भिन्न असतं.म्हणूनच अगदी नैसर्गिकरीत्या त्यांचं शिक्षण होऊ द्यायला हवं.जगण्यासाठीचं खरं शिक्षण हे मुलांना आजूबाजूच्या निरिक्षणातूनच मिळतं असतं.त्यामुळे पालकांनी शिक्षणाच्या शर्यतीत आपल्या मुलांना उगाचंच पळवू नये असं मला वाटतं.शिक्षण व्हावं याकडे लक्ष द्यावं पण अट्टहास आणि सक्ती नसावी.कारण प्रत्येक मूल त्याच्या गतीनं शिकतच राहतं.पालक उगाचंच नाहक काळजी करुन शिक्षण त्यांच्यावर लादत राहतात.पण एक लक्षात ठेवा की, लादलेल्या गोष्टी पूर्ण होतात पण यशस्वी होत नाहीत.म्हणूनच पाल्यांच शिक्षण म्हणजे काय हे समजून घेऊन विचार केला जावा.
सौ.सुधा पाटील सांगली

कविता माझी...

*हो....मला स्वच्छंदी जगायचं आहे*

हो मला स्वच्छंदी जगायचं आहे
तोडून पायातल्या बेड्या साऱ्या
उंच गगनात भरारी घ्यायची आहे.
स्वच्छंदी पक्षी होऊन,वाऱ्यासोबत धावायचं आहे, फुलांचा सुगंध मनसोक्त लुटायचा आहे..
हो..
मला स्वच्छंदी जगायचं आहे...

स्वतःच्या पायावर उभं राहून,
माझीच प्रतिभा मला वाढवायची आहे.
नवनवीन तंत्रज्ञान शिकून सारं
मला अपडेट होऊन जगासोबत चालायचं आहे.
हो...
मला स्वच्छंदी जगायचं आहे.

समजलं आहे मला आता निसर्ग नियम सर्वांना सारखेच आहेत.
म्हणूनच मला माणूस म्हणून जगायचं आहे.
शतकानुशतकाची झुगारून बंधने,आता जरा मोकळा श्वास घ्यायचा आहे.
हो..
मला स्वच्छंदी जगायचं आहे.

माझं चालणं, माझं बोलणं, माझं हसणं, माझं हक्कासाठी लढणं, माझं हवं तसा पेहराव करणं.... सारं सारं.... कोणाच्या तरी अधीन आहे....ते सारंच आता थांबवायचं आहे...
माझा प्रत्येक क्षण आता... मला माझाच हवा आहे... म्हणूनच त्यासाठी मला लढायचं आहे.
हो...
मला स्वच्छंदी जगायचं आहे

चाकोरी सोडून आता वळणावळणाची वाट तुडवायची आहे...मोकळा श्वास घेऊन दबलेला आनंद उधळायचा आहे.
मलाच खूप खूप शुभेच्छा देऊन जिंकायचं आहे
छंद सारे जोपासून जीवनाचं अमृत चालायचं आहे.
हो...
मला स्वच्छंदी जगायचं आहे.

चला छंद जोपासूया..

🌹चला छंद जोपासूया.... आपलं मानसशास्त्र फुलवूया 🌹
     राकेश वरपे सर यांचे फेसबुक वरील हे दोन ग्रुप खूपच कौतुकास्पद आहेत.कारण यामुळे समाज विधायक असं कार्य उत्तमरित्या घडतं आहे.अनेक समुपदेशक, मानसशास्त्र प्रेमी आपापल्या परीनं समाजातील मानसिक विकृतींवर प्रकाश टाकत आहेत.आणि विविध छंद जोपासण्याची प्रेरणा देऊन अनेक सामाजिक विकृती कशा कमी होतील?माणूस आनंदी कसा बनेल? यासाठी प्रयत्न करणारे हे दोन्ही ग्रुप आहेत.यातील सर्व मेंबर एका कुटुंबातील सदस्यांप्रमाणे समाज जागृतीचं काम करीत आहेत.ही खरंच खूप मोठी समाजसेवा आहे.कारण सुंदर जगण्याचं गमक मानसशास्त्रातच आहे.पण त्याकडेच दुर्लक्ष होऊन माणूस सुंदर जीवनाला नैराश्याच्या खाईत लोटतो.यातून माणसाला बाहेर काढण्याचं काम मानसशास्त्र आणि त्याचे छंद करीत असतात.म्हणूनच हा सहसंबंध समजून घेऊन जीवन सोपं करुया.
     खरं तर अज्ञानामुळे माणूस अंधारात भटकतो.पण मानसिक आरोग्य, मनाचं कार्य, घटना आणि मानसशास्त्र यांचा सहसंबंध हे समजून घेतलं तर माणूस हे जीवन सहजपणे जगू शकतो.आपले छंद आणि आपलं मानसशास्त्र यांचा सहसंबंध खूप जवळचा आहे.आपले छंद आपणास आनंद देतात.एकट असलं तरी एकाकी वाटू देत नाहीत.आपले छंद आपलं मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतात.म्हणूनच प्रत्येकाने आपले वेगवेगळे छंद सतत जोपासत राहिलं पाहिजे.जीवनात गरजेइतका पैसा आणि छंद सोबत असले कि आयुष्याचा उत्सव नक्कीच बनवता येतो.जीवनात आनंद अगदी छोट्या छोट्या गोष्टींतून मिळवता येतो.अंगणात बसून आकाशातील चंद्र देखील  आनंदाचा प्रकाश तुमच्या मनात पेरतो.आजूबाजूचा सुंदर निसर्ग तुम्हाला जगणं शिकवतो.बस्स!तशी नजर हवी.निरिक्षण हवं.मग आयुष्य फक्त सुंदर वाटेल.अति अपेक्षा आपणांस आपल्या छंदांपासून दूर नेतात.मग माणूस नैराश्यात अडकत जातो.यातून आपणचं आपणास बाहेर काढू शकतो.इतर लोक फक्त मार्ग दाखवू शकतात.चालायच तर आपणच असतं.म्हणूनच जेव्हा जेव्हा नैराश्यात मन अडकू पाहत तेव्हा तेव्हा आपले छंद आठवावेत.ते जोपासावेत.त्यामुळे आपलं मन कलाटणी घेतं.प्रत्येक माणसांत काही तरी छंद असतातच.हे काळाच्या ओघात मागे पडत जातात.पण ते वेळोवेळी जोपासत रहावं.त्यामुळे मानवी मन,त्याच आरोग्य उत्तम राहू शकत.प्रत्येक गोष्ट, घटना यामागचं मानसशास्त्र प्रत्येकाला समजू लागलं तर नक्कीच जगण्याचे मार्ग सुकर होतील.म्हणूनच आपले छंद आणि आपलं मानसशास्त्र यांचा सहसंबंध लक्षात घेऊन आपले छंद जोपासा आणि हे जीवन सुंदर बनवा.खरचं "कसली ही दु:खं! किरकोळ तक्रारी साऱ्या!"
सौ.सुधा पाटील

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती..     बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्...