रविवार, २ ऑगस्ट, २०२०

मैत्री

🌹🌹🌹🌹 मैत्री 🌹🌹🌹🌹

        मैत्री असावी एकमेकांत गुंफलेली,
         जणू एकरुप असणारी,
        मैत्री असावी शीतल चंद्रासारखी
        सदैव प्रकाश बनून सोबत चालणारी,
        मैत्री असावी फुलांच्या गुच्छासारखी,
        सदैव एकत्र गुंफून आनंद देणारी,
       मैत्री असावी सदैव अल्लड आणि बाल,
       आपला प्रत्येक क्षण जादूमय करणारी
         खरंच जीवनात मैत्री असावी
        जीवनाला ही पुरून उरणारी
       अन् आयुष्य खट्याळ बनवणारी!

      मैत्री! शब्दांच्या पलीकडले जाऊन नात्याचा उत्सव करणारी! जगातलं एकमेव नातं जिथं कशालाच मर्यादा नसतात.चाकोरी सोडून मनमुराद आनंद जिथं लुटला जातो ते हक्काचं ठिकाण म्हणजे मैत्री! अगदी बालपणापासून मैत्री नावाचं रोपटं मनात रुजलं जातं.वयाच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक मित्र भेटत जातात.सारेच त्या त्या वेळी आपला आधार बनतात.काही मित्र अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपले सोबती बनून राहतात.कधी कधी स्वार्थापोटी मैत्रीच्या नात्याला कलंकित करणारी माणसंही भेटतात.पण ती मित्र नसतातंच.जे मित्र असतात त्यांना मैत्रीची जाणीव असतेच.तिथं आपसूकच कर्तव्याची परिपूर्ती होतं असते.
     खरे मित्र तेच असतात जे वेळोवेळी तुमच्या चुका दाखवून तुम्हाला सावध करतात.आणि काही कौतुकास्पद असेल तर आनंदाने उत्सव साजरा करतात.जगातील साऱ्या नात्यांपेक्षा हृदयाच्या अत्यंत जवळ असणारं नातं म्हणजे मैत्री!कारण तिथं कोणतंच गुपीत गुपीत राहतं नाही.अशी ही मैत्री आयुष्याला संगीतमय करते.सुखाची बरसात करते.मैत्री म्हणजे जणू श्र्वास! संकटकाळी सोबत असणारी आस! म्हणूनच हे नातं जपायचं! मनात खोलवर रुजवून सजवायचं!
     मित्रांसोबत घालवलेले क्षण अविस्मरणीय असतात.दंगामस्ती,आचरट विचरट भाषा, बेधुंद जगणं, एकमेकांच्या जखमांवर फुंकर मारणं, रडणं,हसवणं,एकमेकांची गुपितं जपणं, चेष्टा मस्करी,खाण्यात अर्धा वाटा हे सारं सारं फक्त मैत्रीतंच घडू शकतं.मैत्रीला वय नसतं.पण भावना असतात.विचारांची समान पातळी असते.जोपर्यंत हे सुंदर नातं या पृथ्वीवर आहे तोपर्यंत आनंदाचा खजिना इथे अमाप असेल.पावसाच्या सरींनी बेधुंद होऊन बरसावं तसंच मैत्रीचं नातं सदैव बरसतं असतं.मनाला उभारी देत असतं.इथ फायदा तोटा याची गणितं कधीच मांडली जात नाहीत.म्हणूनच ते ईश्र्वरी रुप आहे.
सौ.सुधा पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती..     बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्...