शनिवार, २३ ऑगस्ट, २०२५

मनाच्या पत्रिका

#मनाच्या_पत्रिका
...........लग्नाचा मौसम सुरू झाला आहे.. वधूवरांच्या पत्रिका बघणं,किती गुण जुळतात हे बघणं...मग लग्न बांधायची का नाही याचा विचार करणं..
हे सारं सुरु झालं आहे.पण खरंच पत्रिका बघणं गरजेचं असतं का?आणि किती गुण जुळले तर लग्न बांधावी हे कोणी ठरवलं?ज्यांचे जास्तीत जास्त गुण जुळतात ते खरंच मनापासून एकत्र राहतात का? याचा देखील एक रिसर्च व्हावा आणि त्याची देखिल अनुमाने काढली जावीत असं मला वाटतं.😀...
कारण मी काही जणांकडून ऐकलं आहे.... छत्तीसच्या छत्तीस गुण जुळून एका जोडप्याचा घटस्फोट झाला.आणि ज्यांनी पत्रिकाच पाहिली नव्हती त्यांचा संसार सुखाचा सुरु आहे.मुळात लग्न बंधनाने दोन भिन्न स्वभावाचे जीव, दोन भिन्न संस्कृतीत वाढलेले जीव एकत्र येऊन सहजीवनाची सुरुवात करीत असतात.त्यामुळे अर्थातच एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या आवडीनिवडी जपणं किंवा त्यांच्या आड अडथळा न बनणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.मुळात मनाच्या पत्रिका जुळणं आधी महत्वाचे असते.पण काळ बदलला तरी त्या कोणी बघतंच नाही.आजकाल वाढलेल्या अपेक्षा, अजूनही जपली जाणारी पुरुष प्रधान संस्कृती यामुळे लग्न होणं अवघड...आणि झाली तरी ती टिकणं हल्ली अवघड होऊन बसले आहे....
मुळात कर्मकांडे करणं, मुहूर्त बघणं ,अशा गोष्टी मानसिक दुबळेपणा,भीती यापोटी केल्या जातात.खूपदा मनातली भीती, अविश्वास याला कुठेतरी स्थैर्य मिळाव यासाठी देखील काही गोष्टी केल्या जातात.थोडक्यात काय तर,एखादी गोष्ट घडणाऱ्या वेळीच घडणार असते, पण जर का कोणी त्याबद्दल काही भाकीत केलं तर माणूस तोवर मनाला शांत ठेवतो.हाही नकळत एक मानसिक स्थैर्याचा प्रकार म्हणायला हरकत नाही.पण त्यांच्या किती आहारी जायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं.
असो... लग्न करताना,जर तरुण पिढी देखील पत्रिका बघणं पसंत करत असेल किंवा त्यावर विश्वास ठेवत असेल तर मात्र अजूनही विक्षान युग दूर आहे.अजूनही समाज अज्ञानी आहे असंच म्हणावं लागेल. पण जोपर्यंत मनाच्या पत्रिका जुळत नाहीत तोवर खऱ्या अर्थाने छत्तीस गुण जुळतंच नाहीत. कागदावरच्या गुणांपेक्षा स्वभावाचे गुण जुळून येण खूपच गरजेचे असते.
     एक काळ होता जेव्हा दिलेला शब्द पाळण्यासाठी,किंवा पाहुण्यातील आहे म्हणून लग्नं व्हायची. जास्त मुली होत्या त्या कुटुंबातील पालक लग्नं प्रकारची म्हणून जास्त काही न पाहता लग्नं करुन द्यायची.पण तेही संसार झाले...रेटले. पण तिथे कुठेही पत्रिका आड आली नाही. थोडक्यात काय तर...संसारासाठी दोन सक्षम मने लागतात. पण आज माणसं लग्न टिकण्यासाठी हव्या असणाऱ्या गोष्टी न पाहता पत्रिका पाहतात आणि त्यावरच जास्त विश्वास ठेवतात. विज्ञान युगातही वेल एज्युकेटेड माणसंही केवळ पत्रिका जुळत नाही म्हणून सर्व बाजूंनी योग्य असणार स्थळ सोडत असतील तर अवघड,आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे? ...मग माझा समस्त वर्गाला एक प्रश्न आहे....स्थळ चांगलं नाही...पण पत्रिका शंभर टक्के जुळते अशा ठिकाणी लग्न जुळविले का?...अर्थात सर्वांच उत्तर नाही असंच असणार...
फक्त विचार करा....
लग्नं ही प्रेमावर...
समजुतीवर...आणि एकमेकांना दिल्या जाणाऱ्या आदरावरच.....परिपक्व होत जातात...
लेखिका,समुपदेशक
सौ.सुधा पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती..     बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्...